श्री बाळकृष्ण महाराज (सुरतकर)

जन्म: २८ ऑक्टोबर १८८६.                                    
पुण्यतिथी: वैशाख कृष्ण एकादशी शके १९४०, दिनांक ११ मे १९१८.
सत्पुरुष: बाळकृष्ण महाराज, संस्थापक श्री स्वामी समर्थ मठ दादर, मुंबई व सुरत

बाळकृष्ण महाराज, श्री स्वामी समर्थ मठ दादर
बाळकृष्ण महाराज, श्री स्वामी समर्थ मठ दादर

वैशाख कृष्ण एकादशी शके १९४० (११ मे २०१८) ! श्री स्वामी समर्थ संप्रदायातील थोर सत्पुरुष आणि दादर व सुरत येथील मठाचे संस्थापक श्री सद्गुरु बाळकृष्ण महाराज यांची १०० वी पुण्यतिथी ! श्री बाळकृष्ण महाराजांची समाधी ही सुरत येथे श्री बाळकृष्ण महाराजांनीच स्थापन केलेल्या श्री स्वामी समर्थ मठापासून काही अंतरावर तापी नदीच्या काठी अश्विनीकुमार येथे आहे. समस्त स्वामीभक्त मुंबईकरांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीमार्गाकडे वळवण्यामध्ये दादर मठाची पर्यायाने श्री बाळकृष्ण महाराजांची मोठीच भूमिका राहिलेली आहे. आजही या दादर मठात महाराजांनी सुरू केल्याप्रमाणे विविध धार्मिक उत्सव, स्वामींची दैनंदिन आरती तसेच दर गुरुवारी आणि शनिवारी भजनाची परंपरा अखंडपणे जोपासली जात आहे. शनिवारी तर संबंध रात्र म्हणजेच पहाटे ५ वाजेपर्यंत भजन चालते. यावर्षी परमपूज्य श्री बाळकृष्ण महाराजांच्या पुण्यतिथी शताब्दी असल्याने दादर व सुरत येथील श्री स्वामी समर्थ मठांच्या दृष्टीने तसेच मठात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी देखील हा पुण्यतिथी उत्सव विशेष महत्त्वाचा आहे. त्यानिमित्त आज श्री बाळकृष्ण महाराजांचे थोडक्यात चरित्र, दादर मठाचा रंजक इतिहास आणि श्री बाळकृष्ण महाराजांच्या समाधीचा भावुक प्रसंग आज या विशेष लेखातून प्रकाशित करत आहोत.

मुंबईमधील दादर येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ अलिकडे दादर मठ नावाने ओळखला जातो. हा मठ श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज सुरतकर यांनी २९ मे १९१० साली स्थापन केला.

"श्री बाळकृष्ण शिवशंकर उपाध्ये (पाध्ये)" उर्फ "श्री बाळकृष्ण महाराज (सुरतकर)" यांचा जन्म सुरत येथे यजुर्वेदी ब्राह्मण कुळात "आश्विन वद्य पंचमी शके १७८८ (दि. २८ ऑक्टोबर सन १८६६)" रोजी झाला. लहानपणीपासूनच त्यांना देवभक्तीची व नामस्मरणाची आवड होती. त्यांच्या वडिलांचे नाव दुर्लभराम व चुलत्यांचे नाव शिवशंकर. पुढे ते आपले चुलते शिवशंकर उपाध्ये यांच्याकडे मुंबईला शिक्षणासाठी आले. चुलत्यांना मुलबाळ नव्हते म्हणून त्यांनी महाराजांना मुलाप्रमाणे वाढवले व शिक्षण दिले. यासाठीच बाळकृष्ण महाराजांनी आपल्या चुलत्यांचे नाव वडिलांचे ठिकाणी घेऊन "बाळकृष्ण शिवशंकर उपाध्ये" असे नाव धारण केले. मुंबईस आल्यावर त्यांच्यावर आर्यसमाजाच्या शिकवणीचा पगडा बसला. त्यांचे चुलते शिवशंकर उपाध्ये कट्टर शिवभक्त होते. त्यांना या गोष्टीचे दुःख झाले. त्यांचे शेजारी शिवशंकर उपाध्ये यांचे गुरू श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त "श्री रामचंद्र  व्यंकटेश भेंडे" उर्फ "श्री तात महाराज" रहात असत. श्री तात महाराजांना बाळकृष्ण महाराजांच्यात सुधारणा करण्याची विनंती केली त्यांच्या चुलत्यांनी केली. त्यानुसार श्री तात महाराजांनी सदगुरु बाळकृष्ण महाराजांना भुलेश्वरच्या अष्टभुजादेवीच्या देवळात देवीचे प्रथम उग्ररूप व नंतर प्रेमळ हास्यमुखाचे दर्शन देऊन त्यांच्या वृत्तीमध्ये आमुलाग्र फरक केला.  त्याचक्षणी महाराजांनी श्री तात महाराजांना गुरु करुन ते श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त बनले. महाराजांना इंग्रजी व संस्कृतचे उत्तम ज्ञान होते. ते शिकवण्या करत व गोकुळदास संस्कृत पाठशाळेत संस्कृतचे मास्तर होते. त्यावेळी ते मास्तर याच नावाने ओळखले जात. जांभुळवाडीत महाराजांचे शेजारीच धोत्रे नावाचे कुटुंब रहात असे. त्या कुटुंबातील पिशाच्चबाधा महाराजांनी दुर केली व तेंव्हापासुन हे साधे ’मास्तर’ नसुन एक दिव्य महात्मे आहेत याची ओळख लोकांना झाली.

जांभुळवाडीतुन महाराज पुढे मालाडात त्यांचे मित्र द्वारकादास, यांच्याकडे रहावयास गेले. महाराजांच्या दैवी सामर्थ्याचा प्रसार झाल्यामुळे पुष्कळ लोक त्यांच्याकडे येऊ लागले. महाराजांना भजन फार आवडत असे व त्यांचेकडे येणाऱ्यांना कटाक्षाने भजन करण्यास गुरुवारी व शनिवारी बोलावीत असत. शनिवारी सबंध रात्र भजन होत असल्यामुळे द्वारकादासांच्या मंडळीस त्रास वाटू लागला. हि गोष्ट कै. विश्वनाथ मोरेश्वर कोठारे (माजी विश्वस्त) व त्यांच्या मातोश्री पुतळाबाई यांना कळल्यावर त्यांनी महाराजांना मालाडला मामलेदार वाडीतील आपल्या घरात आणले. तेथेही पूर्वीप्रमाणेच गर्दी सुरु झाली. महाराजांकडे त्यावेळी कुलाब्यापासुन वसई, घाटकोपर, चेंबुर येथवरची मंडळी दर्शनास व भजनास येत असत. इतक्या लांबुन मालाडला शनिवारी रात्री (ते ही त्याकाळात प्रवासाची साधने आजच्यासारखी उपलब्ध नसताना) भजनास येणे हे गैरसोयीची असल्याने महाराजांनी कोठेतरी मध्यवर्ती ठिकाणी रहाणे सर्वांना सोईस्कर होईल असा विचार भक्तजनांत उत्पन्न झाला. कै. भाऊसाहेब देशमुख त्यावेळी मुंबई कलेक्टरचे हेडक्लार्क असल्यामुळे दादरची पुढे होणारी वाढ त्यांना माहीत होती व महाराजांच्या सांगण्यावरून भक्त मंडळींनी दादरला जागा बघायला सुरुवात केली. त्यांना एक बंगला सापडला तो भुताटकीचा व तीन खुनी बंगला म्हणून ओळखला जात असे. मंडळींनी ही गोष्ट महाराजांस कळविली. महाराज म्हणाले, "काही हरकत नाही आपण तेथे समर्थांची स्थापना करुन सर्व भुतांना मुक्ती देऊ. आपण परत जावे व कुलुप उघडून आत अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध येईल, तो असा आल्यास भाडे देऊन ताबडतोब बंगला ताब्यात घ्यावा." वरील मंडळींना कुलुप उघडल्यावर अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध आला व त्यांनी महाराजांचे सांगण्यावरुन बंगला भाड्याने घेतला. वर भाड्याने घेतलेला बंगलाच आपल्या आजच्या दादर मठाचे स्थान आहे. सन १९१० मध्ये मठ स्थापन झाला. हा बंगला खूपच जुना असल्याने कालांतराने  बंगल्याचे दुरुस्तीचे काम करण्यास सुरु केले. त्याकाळात मठ माटुंग्याला दुसऱ्या जागेत हलवणे भाग पडले. ऑगस्ट १९१३ मध्ये पुरे झाले व ३० ऑगस्ट रोजी मठ परत पहिल्या जागी आला. मधोमध मोठा हॉल. हॉल मधोमध कमान. दोन्ही बाजूला दोन मोठ्या ख़ोल्या व पुढच्या बाजुला म्हणजे रस्त्यावरुन आत शिरण्याच्या बाजुला मोठा ओटा. दोन्ही बाजूला बसावयास दगडी ओटे व पुढे चढण्यास पायऱ्या येण्याच्या मार्गावर दुतर्फा फुलांच्या कुंड्या, तसेच गॅसबत्त्या देखील लागल्या. मठात परत आल्यावर महाराजांनी सध्याचे सिंहासन सुरतहुन कारागिर आणून तयार करविले व सिंहासनाच्या बैठकीत स्वामी समर्थांचे अवशेष घालुन त्यावर संगमरवरी लादी बसवुन समर्थांच्या फोटोची स्थापना केली. महाराज पक्के सिंहासन करतात हे पाहुन यमूताईंनी विचारले "महाराज, हा भाड्याचा मुसलमानाचा बंगला, हे स्थान कायम कसे होणार?" तेंव्हा महाराजांनी, "जो बसणार तोच कायम करणार" असे म्हणून 'कायम कायम कायम' असा त्रिवार उच्चार केला.

पुढे श्री स्वामी महाराजांच्या कृपेने व श्री बाळकृष्ण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे स्थान कायम झाले. बंगल्यात मठ आल्यावर दर्शनास व भजनास येणाऱ्या भक्तांची गर्दी फारच होऊ लागली. गॅसबत्त्यांमुळे प्रकाशाचा झगझगाट होऊन रात्री रम्य व शोभिवंत दिसू लागले. रिवाजानुसार लांबून येणाऱ्या भक्तांसाठी गुरुवार-शनिवार आरती रात्री १० ला सुरु होऊन ११-३० ला संपे. त्यानंतर महाराज, हल्ली महाराजांचे छायाचित्र आहे तेथे आरामखुर्चीत बसत. अर्धा एक तास भक्तजनांचे महाराजांना हार घालणे चाले. हार इतके येत की, तीन-तीन वेळा काढून ठेवावे लागत. त्यानंतर महाराज गुजराथी असुनदेखील मराठीत एकनाथी भागवतावर रात्री दोन वाजेपर्यत प्रवचन करीत. त्यावेळी त्यांचा कंठ दाटून येई. त्यांची शिकवण भक्तिमार्गाची असे. 'एकात अनेक पहावे व अनेकांत एक पहावा', 'परि प्रीतीजे अंतरी आत्मभावे । तया प्रीतीला भक्ती असे म्हणावे’, 'दाताने जीभ चावली म्हणुन कोणी बत्तीशी तोडली’, असा उपदेश महाराज करीत. 

"श्री स्वामी समर्थांना शरण जाऊन व त्यांची उपासना करुन ज्याने त्याने आपला हेतू साधावा; आपणाकडे काही नाही" असे महाराज सांगत असत. महाराजांचे प्रवचन चालू असता श्रोते मंत्रमूग्ध होत असत. मठाचा मुख्य वार शनिवार आहे. त्यादिवशी कोणीही दादर येथील किंवा सुरतेचा मठ सोडून जावयाचे नाही. असा महाराजांचा दंडक आहे. तसेच गाभाऱ्यात कोणीही टोपी, पगडी किंवा रुमाल घालून जावयाचे नाही. ती काढूनच गाभाऱ्यात जाऊन प्रदक्षिणा कराव्यात, असा त्यांचा आदेश आहे. समर्थांना तांबडी फुले, कण्हेर, जास्वंद, तगर घालू नयेत, असा त्यांचा दंडक असे व घातल्यास ताबडतोब कटाक्षाने सांगून काढून टाकत. तांबडा गुलाब मात्र चालत असे. माहीमकर मंडळी दुसरीकडून भजन आटपून येत. रात्री दोन वाजेपर्यंत व उजाडेपर्यंत भजन करत. महाराजांनी भजनास कधी पुरे म्हटले नाही. मंडळी दमल्यास त्यांनी जावे. महाराजांना पूजा-पाठास आठ तास लागत. त्यामूळे दर्शनास गर्दी लोटल्यास किंवा भजन लांबल्यास काही वेळा महाराजांना तीन-तीन दिवस उपास घडत; कारण सेवा आटोपल्याशिवाय ते पाण्याचा थेंबसुद्धा घेत नसत. पूजा आटोपल्यावर महाराज दूध घेत किंवा फराळाचे खात. त्यांनी अन्न सोडले होते. फराळात शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ, वऱ्याचे तांदूळ, शेंगदाणे, बदाम, फळे घेत असत. महाराजांस आंबा फार आवडे. ते स्वत: चहा पीत नसत, पण भक्तांस मठाचा प्रसाद म्हणून देशी साखरेचा चहा देत असत. (आजही मठात गुरुवार व शुक्रवारी भजनाला चहा प्रसाद म्हणून दिला जातो.) 

महाराजांच्या आज्ञेप्रमाणे या मठात स्पृश्य-अस्पृश्य, हिंदू-अहिंदू असा भेद नव्हता व आजही नाही. ज्याला त्याला आपापल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करावयास सांगत. पारश्यांना कस्ती, ख्रिश्चनांना प्रेअर, मुसलमानांना नमाज करण्याची मुभा असे. ज्या भक्तांवर श्री बाळकृष्ण महाराजांची कृपा होत असे त्यांना महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा देत. पादुका पूजन, काही जप, श्री आनंदनाथ महाराज कृत "श्री स्वामी चरित्र स्तोत्र" याचे नित्य पठण इ. सेवा करावयास सांगत. याला सोयर-सुतकाची अडचण नसे. वर्षाचे ३६५ दिवस सेवापूजा करण्याचा महाराजांचा दंडक होता. सन १९१० मध्ये दादरच्या मठ स्थापन झाल्यानंतर सन १९११ साली महाराजांनी सुरतला वडवाली शेरी येथे आपल्या राहत्या घरी सिंहासन करवून त्यात समर्थांचे अवशेष घालून त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करून सुरतेचा मठ स्थापन केला.

श्री सदगुरु बाळकृष्ण महाराजांच्या समाधीचा भावुक प्रसंग

दादर मठाच्या स्थापनेनंतर सन १९११ मध्ये वडवली शेरी बेगमपुरा सुरत येथे सुद्धा महाराजांनी श्री स्वामी समर्थांचा मठ स्थापन केला. त्या मठात श्री स्वामी समर्थांची खाट (पलंग) श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे महाराजांनी अक्कलकोटला जाऊन आणली, ती त्या मठातील गाभाऱ्यात ठेवलेली आहे. महाराज नेहमी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथीची पालखी मुंबईस काढून दुसरे दिवशी तशीच पालखी सुरतेस काढण्यास जात असत, त्याप्रमाणे महाराज १० मे १९१८ रोजी रात्रीच्या गाडीने सुरतेस गेले. त्यावेळेपासून महाराजांनी निर्याणास जाण्याच्या पुष्कळ पूर्वसूचना दिल्या, पण कोणालाच समजल्या नाहीत.

वैशाख वद्य दशमी शके १८४० संवत १९७४ तारीख ४ जून १९१८ मंगळवार रात्रौ ते पहाटे ५ वाजेपर्यंत सुरतेच्या मठात भजनाचा कार्यक्रम होत असताना महाराजांनी तो बंद करून सर्वाना घरी जाण्यास सांगितले. परंतु एक तासाने यावे लागेल असे म्हणाले. त्यांचा अर्थ त्यावेळी कोणालाही कळला नाही. सूर्योदय होण्याच्या थोड्या वेळापूर्वी महाराज मागील चौकात गेले. तेथे एक दोरी टांगलेली होती. तिला धरून महाराज नाचू लागले. 'खडावांचा खड खड खड खड ' असा आवाज ऐकून परमपूज्य आई खाली आल्या व महाराजांस म्हणाल्या, "दोरी जुनी आहे, ती तुटेल व तुम्ही पडाल." महाराजांनी उत्तर दिले, "दोरी तर केव्हाच तुटली आहे, ह्या घे किल्ल्या !" असे म्हणून त्या प. पु. आईच्या अंगावर फेकल्या व म्हणाले, "सांभाळ." प. पु. आई म्हणाली, "मला किल्ल्या का देता?" इतक्यात सूर्योदय झाला. सूर्यास नमस्कार करून बाजूला असलेल्या आरामखुर्चीवर बसून छातीवर हात ठेवून त्रिवार "ओ तात, ओ तात, ओ तात" असे स्मरण करून महाराजांनी मान टाकली. याप्रमाणे महाराज "वैशाख वद्य एकादशी शके १८४० संवत १९७४ बुधवार, तारीख ५ जून १९१८ रोजी" सूर्योदयी" निर्याणास गेले. भजन चालू असताना ते बंद करा असे महाराजांनी केव्हाच सांगितले नव्हते; परंतु त्या दिवशी मात्र ते पाच वाजता बंद करा असे सांगितले व "परत एक तासाने यावे लागेल" असे म्हणाले व "दोरी केव्हाच तुटली" या शब्दावरून बोध असा होतो कि या महान संताने काळास सूर्योदयाची वेळ होईपर्यंत एक तास थांबवून देह ठेविला. आज या थोर महापुरुषाच्या समाधीला थोडी थोडकी नव्हे तर शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. श्री बाळकृष्ण महाराजांची समाधी ही त्यांनीच स्थापन केलेल्या सुरतमधील श्री स्वामी समर्थ मठापासून काही अंतरावर तापी नदीच्या काठी अश्विनीकुमार येथे आहे.

श्री बाळकृष्ण महाराजांचे एक शिष्य वे. शा. सं. कै. रंगनाथ शास्त्री नाशिककर यांनी "सांप्रदायिक परंपरेतील नित्यक्रम" या पुस्तकात श्री बाळकृष्ण महाराजांचे अध्यात्मिक कार्य व समाधिकाल याबद्दल पदे उल्लेखिलेली आहेत.

थोडक्यात त्यांची कामगिरी
(वृत्त - स्त्रग्धरा)

बाल्यी विद्या शिकोनी, निज गुरुवचने पुत्र होतांच सोडी ।
संसाराते, करि जो यतिवर गुरुची भक्ती, सामर्थ्य जोडी ॥
आज्ञा होताच नाशी विविध जनमनस्ताप, सेवेस लावी ।
स्वामींच्या भक्त वृंदा, मधुर निजवचे बोधूनी प्रेम दावी॥

त्या महापुरुषाचा समाधिकाल

(वृत्त - इंद्रवज्रा)

वैशाख एकादशी कृष्ण पक्षीं । वारी बुधाच्या गुरू तो अलक्षी ॥
शुन्याब्धि नागेन्दु शकीं अम्हाते । सोडोनि गेला प्रभुच्या पदाते ॥

अशा या श्री स्वामी समर्थ संप्रदायातील थोर सत्पुरुष श्रीमद सदगुरू बाळकृष्ण महाराजांच्या १०० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना सुकोमल चरणीं सादर सप्रेम प्रणाम.

॥ राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥
॥ श्रीमद् सद्गुरू बाळकृष्ण महाराज की जय ॥

जय जय गुरू महाराज गुरू । जय जय बाळकृष्ण सद्गुरू ॥