अश्वत्त्थ माहात्म्य

अश्वत्त्थ म्हणजे पिंपळ वृक्ष
अश्वत्त्थ म्हणजे पिंपळ वृक्ष

अश्वत्त्थ म्हणजे पिंपळ वृक्ष. ब्रह्मांड पुराणात अश्वत्थाचे महात्म्य संगितले आहे. स्वतः ब्रह्मदेवाने हे महात्म्य नारदमुनीला संगितले आहे. नारदमुनींनी अश्वत्थाचे वर्णन करतांना संगितले की अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी स्वतः ब्रह्मदेवाचा वास असतो, मध्यभागी विष्णु तर टोकाला रुद्र रूपी महादेवाचा वास असतो. वृक्षाच्या दक्षिणेकडील पाना फांद्यांवर शूलपाणी, पश्चिमेकडील शाखा पानांवर निर्गुण स्वरूपी विष्णु तर उत्तरेकडील पाना फांद्यांवर ब्रह्मदेवाचे अधिष्ठान असते. इंद्रदेवाचे अधिष्ठान पूर्वेकडील शाखा पानांवर असते. अशा तर्हेने अश्वत्थ वृक्षाच्या चारही दिशांना ब्रह्मा, विष्णु, महेश व इंद्र्देवाचे अधिष्ठान रात्रंदिवस अखंडपणे असते. अशा प्रकारे संपूर्ण अश्वत्थ वृक्षच देवतांनी व्यापून टाकला आहे. गो-ब्राह्मण व समस्त ऋषिगण तथा वेदादी यज्ञ-यागाच्या देवता ह्या अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी निरंतर वास करीत असतात. सर्व नद्यांची तीर्थे आणि सातही समुद्रांच्या देवता ह्या अश्वत्थ वृक्षाच्या पूर्वेकडील शाखेवर निरंतर वास करीत असतात. अ-कार शब्द हा अश्वत्थाच्या मुळाशी असतो, स्कंध शाखा येथे ऊ-कार स्वरूप तर फळ व पुष्पे येथे म-कार वर्ण असतो. असा अ ऊ म म्हणजे ॐ कार स्वरूपाचे तेथे वास्तव्य असते.

आग्नेय दिशेला अश्वत्थ वृक्षाचे मुख असते. आग्नेय दिशेला एकादश रुद्रादिक असून अष्टवसू तेथे वास करतात. तेथेच त्रैमूर्ती व इतर समस्त देवतांचे वास्तव्य असते. ह्या सर्व वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींमुळे हा वृक्ष अश्वत्थनारायण झाला असून त्याच्या महतीचे वर्णन करणे शक्य नाही आणि ह्याच कारणांमुळे याला कल्पवृक्ष संबोधिले जाते. या कल्पवृक्षाची सेवा पूजाअर्चा करून आपले जीवन कसे सुखकर करावे, त्याचे व्रत कसे असते हे सांगतांना ब्रह्मदेव म्हणाले की हे व्रत आषाढ,पौष,चैत्र, महिन्यात किंवा गुरु शुक्र ग्रहांचा अस्त असताना तसेच चंद्रबळ नसताना ह्या व्रताची सुरुवात करू नये. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही महिन्यात चांगला दिवस पाहून शुचिर्भूत होऊन व उपवास करून प्रारंभ करावा. 

रविवारी किंवा मंगळवारी अश्वत्थला आतळू नये अथवा स्पर्शू नये. त्याचप्रमाणे भृगुवारी म्हणजे शुक्रवारी किंवा संक्रातीच्या दिवशी ह्या वृक्षाला स्पर्श करू नये. संधि रात्री रिक्ता तिथीला तसेच पर्वणीच्या वेळी व्यतीपाताच्यावेळी किंवा दुर्दिनादी वैधृतीला अपरान्ह समयी अश्वत्थ वृक्षाला स्पर्शू नये. प्रदक्षिणा करताना आनंदी मनाने व वाचेने पुरुषसूक्त म्हणत शुद्ध कर्माने व भक्तिपूर्वक अंतःकरणानी असावे. पुरुषसूक्त म्हणणे शक्य नसेल तर विष्णू सहस्रनाम म्हणत आनंदी मनाने प्रदक्षिणा घालाव्यात. हे ही जमत नसेल तर मौन धरून साध्या प्रदक्षिणा कराव्यात. अशा प्रकारे केल्या तर त्याचे फळ खूप मोठे प्राप्त होते. प्रदक्षिणा करतांना कंबरेवर पाण्याने भरलेली घागर घेतलेली गर्भाशी स्त्री जशी चालते त्या प्रमाणे अगदी मंद गतीने शुद्ध भावाने प्रदक्षिणा कराव्यात. असे केल्याने अश्वमेधाचे पुण्य प्राप्त होते. प्रदक्षिणा समाप्त झाल्यावर तसेच प्रदक्षिणेच्या मध्यभागी नमस्कार करावा. दोन लाख प्रदक्षिणा केल्या तर ब्रह्महत्यादी सारखे घोर पाप देखील नष्ट होतात.

वर सांगितल्याप्रमाणे प्रदक्षिणा केल्या असता सर्व पापे धुतली जातात. गुरुसंबंधी व गुरुसेवेत घडलेले पाप नष्ट होते. नाना व्याधींचे हरण होऊन प्रदक्षिणा फलद्रूप होतात. अशा प्रदक्षिणा मारण्याने फार मोठ्या रुपयांचे ऋण देखील फिटते. जन्म मृत्युचे भय जाऊन संसारातील भयाचा नाश होतो. १००० प्रदक्षिणा जर केल्या तर ग्रह दोषातून मुक्तता होते. १०८ अश्वत्थ वृक्ष लावले असतां पितरांना सद्गती मिळते, पिंपाळाचे झाड लावून त्याची निगा राखणे हा उपाय गुरु ग्रहासंबंधी निवारण म्हणून करतात. तसेच विष्णु, कृष्ण उपासना पिंपळाच्या झाडा खाली केली असता लवकर फलद्रूप होते. मनाने कायेणे व वाचेने अशी एकचीत्ताने सेवा करिता आपली पुत्र कामना पूर्ण होते, असे ब्रह्मवाक्य आहे. शनिवारी वृक्षाला धरून जर मृत्युंजयाच्या मंत्राचा विधिवत जप केला तर अकाल मृत्यू ह्यांच्यावर विजय मिळू शकतो. त्याला अपमृत्युचे भय राहत नाही व तो पुर्णायूषी होतो. केवळ प्रदक्षिणेने शनिग्रहाची पीडा देखील सौम्य होते. अश्वत्थाची उपासना केली तर शनि पीडा दूर करण्यासाठी इतर काही करावयाची काही गरज रहात नाही.

अमावस्या व गुरुवारी अश्वत्थवृक्षाखा ली छायेत पाणी ठेऊन स्नान केले तर ब्रह्महत्येचे देखील पाप नष्ट होते एवढा प्रभाव या वृक्षाचा आहे. अश्वत्थाच्या तळाशी ब्राह्मणांना एकदा जारी भोजन दिले तरी फार मोठे पुण्य पदरी मिळते असे ब्रह्मदेवाने नारदास संगितले. अश्वत्थाच्या मुळाशी बसून मंत्राचा जप केला असता अनंत पटीने त्या मंत्रजपाचे फळ मिळते. त्याच प्रमाणे वेडाचे जर पठण केले तर अनेक गुणांनी वेद पठण केळ्याचे पुण्य मिळते. जर भक्ति युक्त अंतःकरणांनी अश्वत्थ वृक्षाची स्थापना केली तर आपले बेचाळीस पितरांचा उद्धार होईल असा महिमा ब्रह्मदेवाने नारदास सांगितला. त्याचप्रमाणे हे वृक्ष कापले तर महापाप लागेल असे संगितले. अश्वत्त्थ तळी जर यथासांग होमहवन केले तर महायज्ञ केल्याचे पुण्य मिळून आपली कामना लवकर फळते असे वर्णन ब्रह्मदेवाने नारदमुनी जवळ केले.

श्री गुरुचरित्र व अश्वत्थ वृक्ष महिमान, पुत्र प्राप्तीसाठी सिद्ध साधना  

सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "श्रीगुरुंच्या कृपेने एका साठ वर्षांच्या वांझ स्त्रीला पुत्र झाला, ती अद्भुत कथा ऐक. ती कथा अशी, सोमनाथ नावाचा एक शौनकगोत्री ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव गंगा. पतिपरायण असलेली ती स्त्री वेद्शास्त्रानुसार आचरण करीत असे. ती साठ वर्षांची झाली तरी तिला मुलबाळ नव्हते. ती नित्यनेमाने श्रीगुरुंच्या दर्शनाला येत असे व नीरांजनाने त्यांची आरती करीत असे. तिचा हा नेम बरेच दिवस चालू होता. तिच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या श्रीगुरुंनी तिला विचारले, "तू नित्यनेमाने माझी नीरांजनाने आरती करतेस. तुझी काय इच्छा आहे? तुझी जी काही कामना असेल ती सांग." 

श्रीगुरू असे म्हणाले असता गंगा त्यांच्या पाया पडून म्हणाली, "स्वामी, 'अपुत्रस्य गतिर्नास्ति'. निपुत्रिकाला स्वर्ग प्राप्त नाही. निपुत्रिक स्त्रीचे तोंड पाहू नये असे लोक म्हणतात. जिच्या पोटी मूल नाही त्या स्त्रीचे आयुष्य व्यर्थ आहे. पुत्रजन्माने मागच्या बेचाळीस पिढ्या उद्धरून जातात. पुत्राविना घर अरण्यासमान. मी जेव्हा गंगेवर स्नानासाठी जाते त्यावेळी लेकुरवाळ्या स्त्रिया आपल्या मुलांना कडेवर घेऊन येतात; पण माझ्या नशिबात ते नाही. ज्यांना पुत्रपौत्र असतात, त्यांना परलोक प्राप्ती होते; पण निपुत्रिकाला पिंडदान कोणी करत नसल्याने त्याला मुक्ती मिळत नाही. आता हा जन्म पुरे झाला. तो फुकट गेला. आता माझा पुढचा जन्म तरी सफल होईल, पुत्रप्राप्तीची माझी कामना पूर्ण होईल असा वर मला द्या." त्यावर श्रीगुरू हसून म्हणाले, "पुढचा जन्म कोणी पाहिला आहे ? पुढच्या जन्मी तुला या जन्मातले काही आठवेल का ? तेव्हा पुढच्या जन्माचे सोडून दे. तुला याच जन्मी सुलक्षणी कन्या-पुत्र होतील यावर पूर्ण विश्वास ठेव."

त्यावर ती स्त्री म्हणाली, "स्वामी, हे काय सांगता ? मला आता साठ वर्षे झाली. आजपर्यंत पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक व्रतवैकल्ये केली, नवससायास केले, अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या, सगळे काही मी विश्वासाने केले; पण कशाचा काही उपयोग झाला नाही. आजही मी अश्वत्थाला (पिंपळाला) मूर्खपणाने प्रदक्षिणा घालीत आहे. या नाही तर पुढच्या जन्मी तरी अश्वत्थसेवा फळाला यावी. आता मी साठ वर्षाची झाले, माझा विटाळही गेला, असे असतानाही याच जन्मी मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिलात. !!"

श्रीगुरू म्हणाले, "अश्वत्थसेवा महापुण्यकारक आहे. ती कधीही व्यर्थ जात नाही. तू अश्वत्थाची निंदा करू नकोस. अश्वत्थाची तू सेवा कर. तुला नक्की पुत्रप्राप्ती होईल. आता आम्ही सांगतो तसे कर. तू नित्यनेमाने भीमा-अमरजा संगमावर जा. तेथे अश्वत्थवृक्ष आहे. आम्ही दररोज अनुष्ठानासाठी तेथे जात असतो. तेथे अश्वत्थरूपाने प्रत्यक्ष नारायणाचे वास्तव्य आहे." 'मला अश्वत्थाचे माहात्म्य सांगा' अशी त्या स्त्रीने विनंती केली असता श्रीगुरू म्हणाले, अश्वत्थाची निंदा कधीही करू नये. त्याचे माहात्म्य फार मोठे आहे. अश्वत्थाच्या ठिकाणी सर्व देवांचे वास्तव्य असते. एका अश्वत्थाच्या सेवेने सर्व देवांची सेवा केल्याचे फळ मिळते. ब्रह्माण्ड पुराणात प्रत्यक्ष ब्रम्ह्देवांनी नारदमुनींना अश्वत्थाचे माहात्म्य सांगितले आहे. एकदा त्रैलोक्यसंचारी नारदमुनी फिरत फिरत पृथ्वीवरील ऋषींच्या आश्रमात आले. नारदमुनींना पाहून सर्व ऋषींना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्यांना अर्घ्यपाद्य देऊन त्याचे उत्तम स्वागत केले. "मुनिवर्य, आम्हाला अश्वत्थाचे माहात्म्य सांगा' अशी सर्व ऋषींना विनंती केली असता नारदमुनी म्हणाले 'प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी मला अश्वत्थ माहात्म्य सांगितले आहे, तेच मी तुम्हाला सांगतो. अश्वत्थ म्हणजे प्रत्यक्ष नारायण होय. तो विष्णुस्वरूप आहे. त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव, बुंध्यामध्ये विष्णू व शेंड्यावर रुद्राचे वास्तव्य असते. त्याच्या फांद्यांमध्ये दक्षिणेला शंकर, पश्चिमेला विष्णू, उत्तरेला ब्रह्मदेव व पूर्वेला इंद्रादी सर्व देवदेवता वास्तव्य करतात. त्याच्या सर्व शाखा-फांद्यांवर आदित्य नित्य निवास करतो. त्याच्या मुळात गो, ब्राह्मण, सर्व ऋषी, वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य आहे. पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या व सप्तसागरांचे वास्तव्य आहे. ॐकारस्वरूप अश्वत्थाचे 'अ' हे मूळ, 'उ' म्हणजे बुंधा आणि 'म' म्हणजे फळे-फुले होत. त्रैमुर्तींचे वास्तव्य असलेल्या या पवित्र वृक्षावर एकादशरुद्र व अष्टवसू असे सर्व देव आहेत, म्हणूनच अश्वत्थाला 'कल्पवृक्ष' म्हणतात. एका अश्वत्थाची सेवा केली असता या सर्व देवदेवतांची सेवा घडते व त्यांच्या कृपेने श्रद्धाळू लोकांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. अश्वत्थाचे माहात्म्य अगाध शब्दातीत आहे."

मग नारदमुनींनी अश्वत्थाची सेवा कशी करायची ते समजावून सांगितले. नारदमुनी म्हणाले, "अश्वत्थसेवा व्रताला गुरु, शुक्र व चंद्रबळ असणाऱ्या चैत्र, आषाढ व पौष महिन्यात या व्रताला प्रारंभ करावा. गुरु-शुक्राचा अस्त असताना व चंद्रबळ नसताना या व्रताला प्रारंभ करू नये. याशिवाय इतर महिन्यात दिनशुद्धी पाहून उपवासपूर्वक, शुचिर्भूतपणे या व्रताला सुरुवात करावी. रविवारी, सोमवारी, शुक्रवारी, संक्रातीच्या दिवशी, संध्याकाळी, रिक्त तिथीस, तिसऱ्या प्रहरी, पर्वणीकाळी, व्यतिपात योग असताना वैधृति इत्यादी अशुभ दिवशी अश्वत्थाला स्पर्श करू नये.स्पर्श करणाऱ्याने सदैव शुचिर्भूत असावे. द्यूतकर्म असत्यभाषण करू नये. परनिंदा, वितंडवाद टाळावा, प्रातःकाळी सचैल स्नान करावे. श्वेतवस्त्र परिधान करावे. अश्वत्थाखालची जमीन गोमयाने सारवावी. त्यावर सुंदर रांगोळ्या काढाव्यात. त्या रांगोळ्यात कमळादी शुभाकृती काढाव्यात. शुद्ध जलाने  भरलेले दोन कलश त्या रांगोळ्यावर स्थापन करावेत. त्या दोन्ही कलशांत गंगा व यमुना या नद्या आहेत असा संकल्प करावा. त्या कलशांची गंधाक्षतपुष्पांनी करावी. पुण्याहवाचन करून आपल्या इष्ट कामनेचा उच्चार करावा. मग कलशाने पाणी आणून अश्वत्थाला सात वेळा स्नान घालावे. मग पुन्हा स्नान करून अश्वत्थाची पुरुषसूक्त मंत्रांनी षोडशोपचारे यथासांग पूजा करावी. त्यावेळी लक्ष्मीसहित नारायणाचे ध्यान करावे. सर्व देवदेवांना आवाहन करावे. मग अश्वत्थ नारायणाला वस्त्राने वेढे घालावेत. मग पुरुषसूक्त म्हणत मंदगतीने अश्वत्थाला प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे सर्व संकटे नाहीशी होऊन इष्टकामना पूर्ण होतात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर साष्टांग नमस्कार घालावा. या प्रदक्षिणांचे फळ काय सांगावे ? प्रदक्षिणा घालताना पदोपदी अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते. ब्रह्महत्यादि महापातकांचा नाश होतो. सर्व प्रकारच्या व्याधी नाहीशा होतात. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी नाहीशा होतात. संसारभय राहत नाही. ग्रहपीडा होत नाही. ज्याला पुत्राची इच्छा असेल त्याला उत्तम पुत्रसंतान प्राप्त होते. शनिवारी अश्वत्थवृक्षाखाली मृत्युंजय जप केला असता अपमृत्यू टळतो. पूर्ण आयुष्य प्राप्त होते. अश्वत्थवृक्षाखाली बसून शनिअष्टकस्तोत्र म्हटल्यास शनीची पीडा होत नाही. साडेसातीचा त्रास होत नाही. अश्वत्थवृक्षाखाली मंत्रपाठ केल्यास वेदपठणाचे पुण्य मिळते. जो अश्वत्थाची स्थापना करतो त्याची बेचाळीस कुळे उद्धारून स्वर्गाला जातात. अश्वत्थवृक्ष तोडणे महापाप आहे. असे कृत्य करणारा मनुष्य आपल्या पितरांसह नरकात जातो.

अश्वत्थवृक्षाखाली होमहवन केले असता महायज्ञाचे पुण्य प्राप्त होते. अश्वत्थाला जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या असतील त्याच्या दशांश हवन करावे. हवनाच्या दशांश ब्राह्मणभोजन घालावे. हे सर्व केल्यानंतर व्रताचे उद्यापन करावे. सोन्याचा अश्वत्थवृक्ष विधीपूर्वक ब्राह्मणाला द्यावा. सवत्स श्वेतधेनूचे ब्राह्मणाला दान द्यावे. अश्वत्थाखाली तिळाची रास करून वस्त्राने ती झाकावी व ती ब्राह्मणाला दान द्यावी." असे हे अश्वत्थाचे माहात्म्य नारदांनी ऋषींना सांगितले. तेच श्रीगुरुंनी गंगाबाईला सांगितले, मग श्रीगुरू तिला म्हणाले, "अश्वत्थाचे माहात्म्य असे आहे. ज्याच्याजवळ भावभक्ती आहे त्याला शास्त्रोक्त फलप्राप्ती होईल."

अशाप्रकारे श्रीगुरुंनी गंगाबाईला अश्वत्थमाहात्म्य  सांगितले. मग तिला ते म्हणाले, "आता तू संगमावर जा व अश्वत्थसेवा कर. तुला कन्या-पुत्र प्राप्त होतील." त्यावर गंगाबाई म्हणाली, "स्वामी, मी साठ वर्षांची वंध्या आहे. परंतु तुमच्या वचनावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. तुमच्या सांगण्यानुसार मी अश्वत्थसेवा करीन, " मग गंगाबाई श्रीगुरुंना वंदन करून भीमा-अमरजा संगमावर गेली. तेथे षट्कुल तीर्थात स्नान करून तिने अश्वत्थसेवा सुरु केली. त्याच्या तिसऱ्या दिवशी रात्री तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला. तो तिला म्हणाला, "तुझी इच्छा पूर्ण झाली आहे असे समज. आता तू एक कर. तू गाणगापुरास जा. तेथे श्रीगुरू आहेत, त्यांना तू सात प्रदक्षिणा घालून नमस्कार कर. मग ते तुला जे देतील ते भक्षण कर. आता उशीर करू नकोस. लवकर जा." गंगाबाई स्वप्नातून जागी झाली. तिला सगळे स्वप्न आठवले. चौथ्या दिवशी अश्वत्थाची सेवा करून ती गाणगापुरात श्रीगुरुंच्याकडे आली. तिने श्रीगुरुंना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला, श्रीगुरुंनी प्रसन्न हास्य करून तिच्या ओटी दोन फळे घातली व तिला ते म्हणाले, " तुला मी कन्या आणि पुत्र दिले आहेत. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल."

श्रीगुरुंनी सांगितल्याप्रमाणे गंगाबाईने व्रताचे उद्यापन केले, दानधर्म केला आणि काय आश्चर्य ! त्याच साठ वर्षांची ती वंध्या गंगाबाई ऋतूमती झाली. चौथ्या दिवशी सुस्नान करून ती आपल्या पतीसह श्रीगुरुंच्या दर्शनाला गेली. तिने श्रीगुरूंची यथासांग पूजा केली, तेव्हा श्रीगुरुंनी तिला 'पुत्रवती भव' असा आशीर्वाद दिला. हि बातमी गावात सर्वांना समजताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले. केस पिकलेली, साठ वर्षांची वंध्या गर्भवती झाली ही केवळ भक्तवरद त्रैमूर्ती नृसिंहसरस्वतींची कृपा ! त्यांची मनोभावे सेवा केली असता अशक्य काय ? याची सर्वांना खात्री पटली. सोमनाथालाही खूप आनंद झाला. त्याने तिच्या गर्भारपणातील सर्व विधी यथासांग पूर्ण केले. यथाकाली ती प्रसूत झाली. तिला कन्यारत्न झाले. सोमनाथाने खूप दानधर्म केला. दहा दिवसांनी गंगा आणि सोमनाथ आपल्या कन्येला घेऊन श्रीगुरुंच्या दर्शनाला आली. त्यांनी आपल्या कन्येला श्रीगुरुंच्या पायावर घातले, तेव्हा प्रसन्न झालेल्या श्रीगुरुंनी आशीर्वाद दिला. "हि तुमची कन्या शतायुषी होईल. हिला परमज्ञानी पती मिळेल. हिला सर्वप्रकारची ऐश्वर्ये प्राप्त होतील. दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनाला येईल. हिला पुत्रपौत्र प्राप्त होतील" श्रीगुरुंनी असा आशीर्वाद दिला असता गंगाबाई हात जोडून म्हणाली, "स्वामी, तुमच्या कृपाशीर्वादाने मला कन्या झाली. आता मला पुत्र व्हावा अशी इच्छा आहे. "श्रीगुरू म्हणाले, "तुला कसला पुत्र हवा आहे ? परमज्ञानी असा हवा असेल तर तो अल्पायुषी असेल. तुला दीर्घायुषी पुत्र हवा असेल  तर तो मंदमति असेल. "गंगाबाई म्हणाली, "स्वामी, मला मोठ्या योग्यतेचा,ज्ञानी पुत्र हवा आहे. त्याला पाच पुत्र व्हावेत." श्रीगुरुंनी 'तथास्तु' म्हणून तिला तसा वर दिला. गंगा आणि सोमनाथ यांना अतिशय आनंद झाला. ती मोठ्या समाधानाने परत गेली. पुढे यथावकाश सर्वकाही तसेच घडले. गंगाबाईला ज्ञानी पुत्र झाला. कन्येचेही भविष्य खरे ठरले, तिच्या पतीने मोठमोठे यज्ञ केले म्हणून त्याचे 'दीक्षित' असे नाव सर्वत्र झाले. श्रीगुरू कृपा अशी आहे. जेथे श्रद्धा आहे तेथे फळ आहे, म्हणून सरस्वती गंगाधर सांगतात, "लोक हो ! श्रीगुरूंची मनोभावे सेवा करा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील."

पिंपळाचे महत्व 

१) पिंपळाचा वृक्षात लक्ष्मी, ब्रम्हा, पीतर व सर्व देवाचा वास असतो.
२) सकाळी ४ ते ७.३० ब्रम्हवास असतो.
३) सकाळी ७.३० ते १०.३० विष्णू वास असतो.
४) सायंकाळी ४ ते ७.३० शिववास असतो.
५) रात्री ७.३० ते रात्री परंत लक्ष्मी व कुबेरवास असतो.
६) बरेच जण ना माहित नसते पिंपळाला कधी प्रदक्षिणा मारू नये मी काही लोक रात्री प्रदक्षिणा मारताना पाहिले आहे.
७) पिंपळाचा वृक्षाला सकाळी १०.३० नंतर प्रदक्षिणा मारू नये. दुपारी, सायंकाळी, व रात्री प्रदक्षिणा मारू नये.

पिंपळाचे पूजन

पिंपळ पूजन करताना जास्तीत जास्त पावित्र्य बाळगा. रात्री चुकूनही पिंपळाला स्पर्श करू नका पण तेथे सूर्यास्तापूर्वी दिवे लावल्यास अनेक संकटातून मार्ग निघू शकतो. पण कवळ एक दिवस पूजा करून काही होणार नाही. किमान एक वर्ष चार महिने पिंपळ पूजन केल्यावर त्याचा अनुभव येतो. पण इथे श्रद्धा व विश्वास अपेक्षित आहे विर्थी वर्गासाठी तर पिंपळ पूजन अतिशय लाभदायक आहे तेथे बसून प्रज्ञा स्तोत्र वाचल्यास बुद्धी तीक्ष्ण होते व शिक्षणात चांगले यश मिळते. कोणत्या कामासाठी पिंपळाचे पूजन कसे करावं, कोणत्या मंत्राचा विनियोग करावा, बाधिक दोष कसे नष्ट करावेत, लक्ष्मिला कसे प्रसन्न करावे, तोडलेले संसार पुन्हा कसे जोडावेत; यासह हजारो संकटावर पिंपळ पूजन कसे करावे त्याचे विधी विधान काय आहे याबाबत बरीच माहिती मिळू शकते. पण त्यादृष्टीने कुणीही प्रयत्न करीत नाहीत.

अश्वत्थ महात्म्य

अश्वत्थ म्हणजे प्रत्यक्ष नारायण होय. तो विष्णुस्वरूप आहे. त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव, बुंध्यामध्ये विष्णू व शेंड्यावर रुद्राचे वास्तव्य असते. त्याच्या फांद्यांमध्ये दक्षिणेला शंकर, पश्चिमेला विष्णू, उत्तरेला ब्रह्मदेव व पूर्वेला इंद्रादी सर्व देवदेवता वास्तव्य करतात. त्याच्या सर्व शाखा-फांद्यांवर आदित्य नित्य निवास करतो. त्याच्या मुळात गो, ब्राह्मण, सर्व ऋषी, वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य आहे. पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या व सप्तसागरांचे वास्तव्य आहे. ॐकारस्वरूप अश्वत्थाचे 'अ' हे मूळ, 'उ' म्हणजे बुंधा आणि 'म' म्हणजे फळे-फुले होत. त्रैमुर्तींचे वास्तव्य असलेल्या या पवित्र वृक्षावर एकादशरुद्र व अष्टवसू असे सर्व देव आहेत, म्हणूनच अश्वत्थाला 'कल्पवृक्ष' म्हणतात. एका अश्वत्थाची सेवा केली असता या सर्व देवदेवतांची सेवा घडते व त्यांच्या कृपेने श्रद्धाळू लोकांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

अश्वत्थाला प्रदक्षिणा घालताना पदोपदी अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते. ब्रह्महत्यादि महापातकांचा नाश होतो. सर्व प्रकारच्या व्याधी नाहीशा होतात. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी नाहीशा होतात. संसारभय राहत नाही. ग्रहपीडा होत नाही.